गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

257. इलेक्ट्रिक_वेहीकल्स (E.V.)

 नमस्कार ,
       मी बापा, बाळासाहेब पाटोळे, एक समुद्री विद्युत अभियंता आहे, गेली 27 वर्षे जहाजात इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर म्हणून कार्यरत आहे, या काळात बऱ्याच तांत्रिक गोष्टी पाहत आलो आहे आणि त्याबरोबरच कालानुरूप झालेले बरेच तांत्रिक बदल ही पाहिले आहेत. गेली 9 वर्षे मी ज्या जहाजात काम करत आहे ते जहाज ही विद्युत मोटारीवर चालते हे विशेष. प्रत्येकी 12 मेगा वॅट पावर (ताकद) असणाऱ्या दोन मोटारी आहेत, म्हणजे जहाज पूर्ण ताकदीने चालवायचे असल्यास आम्हाला इतर विद्युत गरजा सोडून 24 मेगा वॅट पावर ही फक्त जहाज चालवण्यासाठी द्यावी लागते. इतकी अफाट पावर तयार करण्यासाठी आमच्याकडे प्रत्येकी 11 मेगा वॅट ची 3 जनरेटर आणि 5.5 मेगा वॅट चे एक असं एकूण चार जनरेटरचा 38.5 मेगा वॅट चा संपूर्ण पावर प्लांट आहे. आणि हे सगळं (पूर्ण विद्युत विभाग) एकहाती मला सांभाळावे लागते ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ही माझी सविस्तर ओळख मी मुद्दामच देतो आहे जेणेकरुन मी पुढं देणारी माहिती ही कांही अभ्यासानंतर देत आहे याची नवीन वाचक मित्रांना खात्री पटेल. चला आता मूळ मुद्द्यावर येऊ.
------------------------------------------------------
पारंपरिक असणारी डिझेल, पेट्रोल वर चालणारी वाहने यांना पळतं ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्या इंधन टाकीत वेळोवेळी इंधन भरावे लागते तरच त्या गाड्या पळू शकतात, पण ही इंधन वापरून पळवली जाणारी वाहने पळताना मात्र हवेत / वातावरणात भरपूर प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड CO2 सोडून पर्यावरणाची हानी/ नुकसान करतात यात कोणाचेही दुमत असणार नाही. आणि याच पर्यावरणाला वाचवण्यासाठी आजकाल "शून्य वायू उत्सर्जन" करणारी म्हणजेच विद्युत प्रवाहावर चालणारी वाहने (E.V.) बाजारात येऊ लागलीत.
        जगभरातील जवळपास सर्व देशांनी या गोष्टीचे स्वागत करत पुढील कांही वर्षात फक्त विद्युत वाहनेच रस्त्यावर चालवण्यास परवानगी असेल अशी पॉलिसी सुद्धा  तयार केली आहे. इलेक्ट्रिक कार(किंवा दुचाकी) वाहने ही विद्युत पावर वर चालतात हे मी वेगळं सांगायची गरज नाहीय. मग हा विद्युत ऊर्जा प्रवाह येतो कुठून? तो येतो त्या वाहनात असलेल्या बॅटरी मधून. त्या बॅटरी मध्ये तो विद्युत प्रवाह साठवलेला असतो आणि वाहन चालवून ती बॅटरी डिस्चार्ज झाली की पुन्हा तिला चार्ज करावी लागते हे ही आपल्याला माहीत आहे. आणि ती बॅटरी पुन्हा चार्ज करण्यासाठी आपल्याला चार्जिंग स्टेशन वर किंवा आपल्या घरी जिथं चार्जर असेल तिथं जाणं आवश्यक असते. यात चार्जिंग खर्च इतर इंधनाच्या मानाने अगदीच नगण्य असतो, वाहन चालवताना आवाज येत नाही की वातावरणात अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साईड सोडला जात नाही (?), आणि म्हणूनच बरेच लोक हे विद्युत वाहनांना पसंती देत आहेत. 2017 या वर्षामध्ये जागतिक लेव्हल वर 10 लाख विद्युत वाहने विकली गेली, 2030 पर्यत हा आकडा वार्षिक सव्वा ते दीड करोड (कार खप) इतका अपेक्षित आहे. विद्युत वाहन बनवताना बॅटरी हीच अत्यावश्यक अशी वस्तू आहे, आणि त्याशिवाय विद्युत वाहन बनवणे किंवा ते वाहन चालणे अशक्य आहे. आपण आजकाल जे स्मार्ट मोबाईल वापरतो त्यामध्ये जी बॅटरी असते अगदी तशाच प्रकारची पण मोठ्या आकाराच्या बॅटरी विद्युत वाहनात वापरल्या जातात. सध्या इंधनावर चालणाऱ्या वाहनात ज्या ऍसिड असणाऱ्या बॅटरी असतात त्यापेक्षा या विद्युत वाहनात वापरल्या जाणाऱ्या बॅटरी फार वेगळ्या असतात. यांना "मेंटेनन्स फ्री, ड्राय बॅटरी" म्हटले जाते. 
1) या बॅटरी मध्ये कोणतेही ऍसिड वापरले जात नाही.
2) या बॅटरीची कोणत्याही प्रकारची देखभाल करावी लागत नाही.
3)बॅटरी लिथियम पासून बनवलेल्या असतात. 
4)बॅटरी मध्ये कोबाल्ट ही वापरले जाते.
5) यांचे सरासरी आयुष्य किमान 2 ते कमाल 4 वर्षे असते.
आता मी मूळ मुद्द्यावर येतो.
विद्युत वाहने खरंच पर्यावरण प्रेमी आहेत का??
यासाठी खालील मुद्दे सविस्तर बोलू;
१. विद्युत वाहनात इंधन थेट जळत नाही म्हणून यातून कार्बन डाय ऑक्साईड CO2 बाहेर येत नाही. हे जर खरं वाटत असेल तर तुम्ही कांही प्रमाणात चुकत आहात. कसं?? चला सांगतो, हे मान्य की ही वाहने थेट CO2 हवेत सोडत नाहीत, पण आपण जेव्हा बॅटरी चार्ज करतो त्यासाठी विद्युत ऊर्जा प्रवाह वापरतो, तो विद्युत प्रवाह कुठून येतो?? जगभरात जास्तीत जास्त प्रमाणात विद्युत निर्मिती ही कोळसा वापरून केली जाते, तो कोळसा जळताना हवेत काय सोडत असतो? याचं उत्तर आहे CO2. बरं हा कोळसा उत्पन्न कोठून होतो?  कोळस्यासाठी पुन्हा जमिन उत्खनन केली जाते, त्या उत्खननात पृथ्वीच्या पोटातून प्रचंड प्रमाणात CO2 आणि मिथेन वगैरे असे गॅस बाहेर पडतात आणि ते थेट वातावरणात मिसळतात.  धरण बांधून पाणी अडवून उत्पादित केलेली आणि आजकाल परमाणू शक्तीवर तयार होणारी वीज ही अगदीच अल्प प्रमाणात उत्पादित होत असते कारण विद्युत ऊर्जेचा डिमांड भयानक आहे. 
२) आता येऊ विद्युत वाहने उत्पादन या मुद्द्यावर. बॅटरी तयार करण्यासाठी लिथियम हा पदार्थ मिळवण्यासाठी पुन्हा धरणी उत्खनन करावे लागते आणि हेच उत्खनन करताना जमिनीतील जलसाठा गायब होणे, पृथ्वीच्या पोटातील अनेकविध गॅस वातावरणात मिसळणे हे अखंडपणे चालू असते. 1 टन लिथियम मिळवण्यासाठी जवळपास 50 टन माती उत्खनन करावी लागते. 
३) एखादी विद्युत कार उत्पादित करण्यासाठी (बॅटरी उत्पादन,सगळे पार्टस, रंग असं सगळं कांही गृहीत धरून) किमान 5 ते कमाल 18 क्यूबिक मीटर टन कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो तो थेट हवेत सोडला जातो. (एक क्यूबिक मीटर म्हणजे 1 घन मीटर आकाराच्या चौकोनी ठोकळ्यात सामावू शकणारा गॅस /किंवा द्रव) इतकं सगळं कमी की काय म्हणून आणखी एक जीवघेणी समस्या म्हणजे या लिथियम बॅटरी आजही 100 सुरक्षित आहेत असं कोणतीही कंपनी छातीठोकपणे सांगू शकत नाही, कारण यात ओव्हर हिटिंग (अतितापमान वाढ ) होऊन आग लागण्याचे प्रमाण आजही लक्षणीय आहे. दुसरी अडचण म्हणजे जुन्या बॅटरी पुनर्वापर करण्यासाठी आजही कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाहीय. म्हणजे प्रत्येक विद्युत वाहनाबरोबर येणारी बॅटरी ही पूढील 2, 4 वर्षात नवीन कचरा करणार आहे हे गृहीत धरावे. आणि तो ही असा कचरा जो नष्ट करणे किंवा पुनर्वापर करणे अशक्य आहे. इंधन कार आणि विद्युत कार यांच्या दरात ही अगदी किमान 50 ते कमाल 90 टक्के इतका वाढीव फरक आहे. इंधनावर चालणाऱ्या 10 लाखाच्या कार सारखी विद्युत कार आपल्याला किमान 15 ते 17 लाख देऊन घ्यावी लागते. इंधन वापरणाऱ्या कार ही वातावरणात घातक वायू जरूर सोडतात, त्यांच्या उतापदनात ही CO2 हवेत सोडला जातो पण विद्युत कार च्या उत्पादनाच्या मानाने ते उत्सर्जन कमी असते. सध्या वार्षिक कांही लाख उत्पादन होणाऱ्या विद्युत कार जेंव्हा वार्षिक करोडो ने उत्पादन चालू होईल तेंव्हा हवेत दर वर्षी किती करोड टन CO2 हवेत सोडला जाईल याची नुसती कल्पना करून बघा. दुर्दैवाने आपण विद्युत गाडी वापरताना मात्र भलते खुशीत असणार की आपण पर्यावरण प्रेमी आहोत.
           म्हणजे मी फक्त इंधन कार वापरा असं म्हणतो आहे का?? नाही, अजिबात नाही. विद्युत कार हेच भविष्य आहे यात वाद नाही, पण ही यंत्रणा सध्या बाल्यावस्थेत आहे. बॅटरी अजून म्हणाव्या तश्या विकसित आणि सुरक्षित नाहीत. बॅटरीचा पुनर्वापर आणि त्यांची विल्हेवाट हे विषय आजही अनुत्तरित आहेत. बॅटरी चार्जिंग साठी विद्युत प्रवाह हा नैसर्गिक साधनातून निर्मित असणे जरुरी आहे, जसे की सोलर पावर, पवनचक्की पावर, अणुऊर्जा पावर वगैरे. यावर जेंव्हा केंव्हा काम होईल आणि विद्युत ऊर्जा नैसर्गिकरित्या मिळवली जाईल ती नैसर्गिक विद्युत ऊर्जा वापरून E.V. वाहने जेंव्हा चार्ज केली जातील तेंव्हाच विद्युत वाहने खऱ्या अर्थाने "पर्यावरण पूरक" बनतील.

बापा
बाळासाहेब पाटोळे
इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
के लाईन शिपिंग कंपनी
टोकियो, जपान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...