शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

262. विश्वाचे आर्त...

           जगाचा मालक स्वतः विठुराया समोर भेटल्यावर माऊलींना विचारतोय, "ज्ञानोबा...काय हो द्यायचं तुम्हाला ? किती किती केलंत इतक्या कमी वयात. रुक्मिणीदेवी सारख्या म्हणीत असतात की तो ज्ञाना काही मागायचा नाही कधी, पण मुक्ताईला पाठीवर घेऊन भावांबरोबर दर आषाढीला तुम्हाला भेटायला येतो पायी चालत चालत, त्याला काहीतरी द्या हो केव्हातरी हातावर. देवाचं बोलणं ऐकून माऊली फक्त हसतायंत. मुक्ताईंकडे पाहतायंत. निवृत्तीनाथही सुचक हसतायंत. देव विचारतोय, "काय झालं ज्ञाना ? काय विचारतोय मी ? काय द्यायचं तुला ?" माऊलींनी हात जोडले,  कौतुकानं देवाकडे पाहिलं आणि म्हणाले, 
"दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥"
           ज्या जगाने त्यांच्या आईवडिलांना मृत्युदंडाची शिक्षा केली त्या जगातल्या ज्याला ज्याला जे जे म्हणून हवंहवंसं वाटत असेल त्याला त्याला ते ते मिळावं, विश्वाला सूर्याची झळाळी लाभो असं म्हणणाऱ्या माऊलीचं काळीज किती मऊ असेल हो...किती मऊ असेल.  अशी माऊली निघाली.  देवाच्या परवानगीविना या देहाने श्वासही घेतला नाही हो कधी तर इतका मोठा निर्णय त्याला विचारल्याविना ? नाहीच. परवानगी मागितली देवाकडे. देवांनीच आठवण करुन दिली त्यासाठीच्या जागेचीही. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर. हीच ती जागा. नामदेव महाराजांच्या म्हणण्यानुसार ही १०९ व्वी वेळ होती, याआधी १०८ वेळा माऊलींनी इथेच संजीवन समाधी घेतली होती. देवाच्या इशाऱ्यानुसार नंदी हलवताच तिथलं विवरं मोकळं झालं. स्वतः नामदेव महाराज आणि त्यांच्या मुलांनी मोठ्या जड मनाने आज्ञेचं पालन करीत सगळी तयारी केली. मृगाजिन घातलं, सिद्धता केली.  कार्तिकातल्या कृष्ण त्रयोदशीचा दिवस ठरला. द्वादशीला म्हणे देवानी स्वतः अन्न रांधून ज्ञानोबांना जेऊ घातलं. तेच अमृत म्हणून समाधीवेळी त्याच्या देहात टिकून राहिलं. हा गोतावळा जमला इंद्रायणीपाशी. कुणी फुलं आणली, कुणी हरिपाठाचा कागद वाचायला घेतला, कुणी बसून राहिले वाटेतच माऊलीला देहरुपात आणखी एकदा तरी पाहायला, कुणी टिपं गाळीत होते, आयाबाया विठोबाला हाका मारीत होत्या की का रे लेकाराला असं वागू देतोस, पोराटोरांना काही कळत नव्हतं फारसं पण आपल्याच वयाचा हे काय करतो ते पाहून तीही कावरीबावरी झाली होती. माऊली ध्यानस्थ झाली. पूजा झाली. पंचखाद्याचा नैवेद्य द्रोणात वाढून ठेवला होता. एका बाजूने श्री निवृत्तिनाथ आणि एकीकडून स्वतः श्रीभगवंतानी हाताने धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेलं. तिथल्या आसनावर विराजमान होऊन माऊलीने तीन वेळा नमस्कार केला, मुद्रा लावली आणि "संजीवन समाधी"त गेली.  पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशतत्त्वाचा मात्र कशातच लय होत नसल्याने ते भगवंताच्या आकाराशी लगडून राहते. असं म्हणतात, पृथ्वी आणि जलतत्त्वाचा लय झाल्यावर देह दिसेनासा झाला. तेज दिसू लागलं मूर्त आकारात. तेजही लय पावल्यावर केवळ नाद उरला.
"रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि"
               असं सांगितलं जातं की, हे समाधीविवर असं आहे की जिथं काळ काम करु शकत नाही. म्हणून ७ शतकांपूर्वी वाहिलेली फुलं तिथे जशीच्या तशी आहेत. पंचखाद्याचा नैवेद्य होता तसाच्या तसा आहे. त्याक्षणी तिथे उपस्थित असणाऱ्या नामदेवांनी या प्रसंगाचं वर्णन लिहून ठेवलंय. ते म्हणतात...
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । 
जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातलें माजवण । 
तैसें जनवन कलवलें ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण । 
तैसेंचि गगन कालवलें ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी ।
पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । 
पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥
तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । 
झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । 
जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । 
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥
          असं कळलं की बा.भ. बोरकरांचीही एक कविता आहे याविषयीची कल्पना करणारी. तिच्या प्रत्येक ओळीत लिहिलंय 'ज्ञानदेव गेले तेव्हा'...इथे चिकटवावीशीही वाटली. पण मग वाटलं की ज्ञानदेव गेलेले नाहीतच ना! आहेत. त्यांची माऊली ज्या जगानं हिरावून घेतली त्याच जगाची माऊली होऊन पुन्हा पुन्हा येत राहतात. नुसतेच येत नाही, कधी परततही नाहीत. इथेच भरून राहतात.  खरं तर वयाची पंचविशीही न पाहिलेला पोर... पण समज उमज किती मोठी बघा... 
      "जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत" इतकं मोठ्ठं तत्त्वज्ञान तुमच्या आमच्या हातावर ठेऊन इंद्रायणी काठी समाधिस्थ झाली माऊली आज २०२२ मध्ये ज्ञानेश्वरीच्या दोन निरनिराळ्या प्रति मिळाल्या. एक अर्थ निरुपणासह. एक पारायणाची. पारायणाची प्रत स्वतः पावसच्या स्वामी स्वरुपानंदांनी विरामचिन्हांकित केलेली आहे आणि सार्थ प्रत वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांची, जिच्या २००६ साली सुधारित प्रथमावृत्ती येण्यापूर्वी पाच दशकांत २ लाखाहून अधिक प्रति लोकांपर्यंक पोहोचलेल्या होत्या. इतके दिवस धजावत नव्हतो वाचायला कारण स्वतःच्या ढिसाळपणाची, आळसाची पूर्ण कल्पना असते ना आपल्याला. देव इतकं चांगलं, इतकं तेजानी भारलेलं काही आपल्या हातात का देतो कुणास ठाऊक ? पण आज सुरुवात करतोय. समजेल तेवढं आत ओतायचं, समजणार नाही ते वेळोवेळी माऊली स्वतः अनुभवातनं शिकवील असा विश्वास वाटतो. असं म्हणतात ज्ञानेश्वरी तुमचे सगळे प्रश्न सोडवते. आजही वर मनात आलेल्या पहिल्याच प्रश्नाचं उत्तर सहज फोटोसाठी प्रत उघडली तरी त्यातल्या चित्राखाली सापडलं बघा.  अध्यात्माच्या अनुभवाविणा ज्ञान कसं व्यर्थ आहे ते भगवान स्वतः अर्जुनाला सांगतानाचा प्रसंग. मोराच्या प्रत्येक पिसावर  डोळा आहे. तरी त्यांना दृष्टी देहावर एकाच ठिकाणी. पिसावरच्या डोळ्यांचा शून्य उपयोग. तसंच बाकी जगातलं सगळं ज्ञान तुमच्या देखण्या पिसाऱ्यावरचे डोळे होईल, वैभव वाढवेल, मानमरातब देईल पण दृष्टी हवी असेल तर अध्यात्म हाच उपाय. त्याविषयीच माऊली म्हणते...
मोराचां आंगीं असोसें । पिसें आहाति डोळसें । 
परी एकली दिठी नसे । तैसे ते गा ॥

कौस्तुभ अरुण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...