एल.आय.सी.आँफिसमध्ये हफ्ता भरण्यासाठी रांगेत उभा होतो.माझ्यापुढच्या माणसाचा नंबर आला.कँशियरने त्याला विम्याची रक्कम सागितल्यावर त्याने पैसे दिले.
"सहा रुपये सुटे द्या", कँशियर बोलला.
"नाहीयेत" "माझ्याकडेही नाहीयेत.
घेऊन या मगच हफ्ता भरा"
"अहो आता मी कुठून आणू"
दोघांचा वाद सुरु झाला तसं मी खिशातून सहा रुपये काढून पुढच्या माणसाला दिले.
"अहो पण तुम्ही कशाला देताय आणि तुम्हाला मी कुठून परत देऊ?"
"नका परत करु"मी म्हंटलं.
त्यानं आश्चर्याने माझ्याकडे पाहीलं आणि हफ्ता भरुन काऊंटर सोडलं.
मी हफ्ता भरला आणि आँफिसच्या बाहेर आलो तर तो समोर उभा.
"साहेब खुप खुप धन्यवाद"
"अहो त्यात कसले धन्यवाद"
"नाही नाही असं कसं. साहेब आपलं नाव?
"मी नाव सागितलं"
चला साहेब कुठंतरी चहा घेऊ"
मी नाही म्हंटलं तरी जबरदस्ती घेऊन गेला.
हाँटेलमध्ये गरम समोसे निघत होते त्यानं समोश्याची आँर्डर दिली. खाऊन झाल्यावर चहाही पाजला. वर निघतांना त्यानं सुटे झालेले सहा रुपयेही त्यानं परत केले.
मी एकदम अवघडून गेलो. "अहो इतका चहानाश्ता झाल्यावर परत पैसे कशाला?"
"साहेब तुमच्या सारखी मदत करणारी माणसं या जगात कमी आहेत. तुम्हाला घ्यावेच लागतील पैसे" माझ्या खिशात पैसे टाकून तो निघून गेला.
एके दिवशी सकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशन वर निघालो होतो. चौकात आलो तर एक म्हातारा रिक्षाची वाट बघत उभा असावा. इतक्या सकाळी इथं रिक्षा नसतात हे त्याला बहुतेक माहीत नसावं. मी त्याच्याजवळ गेलो, चौकशी केली तर त्याला शेगांवला जाण्यासाठी रेल्वेस्टेशनलाच जायचं होतं. मी त्याला गाडीवर घेतलं. म्हातारा सारखा खोकत होता. त्याला म्हणे शेगावच्या गजानन महाराज संस्थानच्या दवाखान्यात उपचारासाठी जायचं होतं. बहुतेक मुलं त्याला विचारत नसावीत.
स्टेशनवर सोडल्यावर सहजच त्याला विचारलं, "बाबा तिकिटाचे पैसे आहेत का?" त्यानं नकारार्थी मान हलवताच मी त्याचं तिकीट काढून दिलं. वरुन त्याला शंभर रुपयेही दिले.
गाडीत बसवतांना एवढा वेळ अबोल असलेला म्हातारा बोलला "बेटा चांगल्या कामाची भरपाई आज नाही तर उद्या मिळतेच. असेच चांगले काम करत रहा"
परवा नाशिकला काम आटोपून मी स्टेशनवर आलो. पहातो तर मुंबईतल्या पावसामुळे जळगांवला जाणाऱ्या काही गाड्या रद्द तर काही खुपच उशीरा धावत होत्या. आता बसने जाण्यापेक्षा रात्रीचा मुक्काम करावा का या विवंचनेत असतांनाच कुणीतरी मला हाक मारली मी चमकून पाहीलं पण मला व्यक्ती ओळखीची वाटेना.
"साहेब कुठं जायचं होतं तुम्हाला?" त्यानं विचारलं.
"मला जळगांवला. पण गाड्या तर रद्द आहेत"
"हो ना या आमच्या मेव्हण्यांनाही भुसावळला जायचंय."
शेजारच्या व्यक्ती कडे बोट दाखवून तो पुढं म्हणाला" यांना मी म्हणतोय की गाडीनं सोडतो पण रात्री कुणी सोबत नाही म्हणून ते नाही म्हणत होते तुम्हांला जर ड्रायव्हिंग येत असेल तर आपण दोघं चालवत जाऊ" मला देवच मदतीला धावून आल्यासारखा वाटला मी लगेच हो म्हंटलं.
गंमत म्हणजे रात्री आम्ही ढाब्यावर जेवलो त्याचे पैसे त्यांनी घेतले नाहीत. विशेष म्हणजे मला ड्रायव्हिंग ही करु दिली नाही. जळगांवला उतरल्यावर मी पाचशेची नोट काढून त्याला दिली त्याने ती घेऊन परत माझ्या खिशात कोंबली. म्हंटला "साहेब माणूसकी सोडली नाही आम्ही अजून.
आणि माझा बाप सांगून गेलाय तुम्ही चांगले काम करत रहा देव त्याची भरपाई केल्याशिवाय राहणार नाही"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा