मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

582. राख ते भस्म..

       दिवस आणि रात्र या मधला संधिप्रकाश तो काळ म्हणजे कातरवेळ अशा वेळी खुपच हळवं झालेलं माझं मन स्वामींच्या समोर धुप केला नेहमी सारखा घर धुपाच्या त्या सुगंधाने भरुन गेलं. काही वेळ गेल्यानंतर धुपाटण्यात राहिली ती रक्षा आणि नकळतच माझ्या लेखणीतून उतरलेल्या या ओळी.
राख होते शरीराची भस्म ते कपाळी
राख होता  प्रवास मुक्तीचा.
भस्म सांगे अर्थ  जिवनाचा 
       प्रत्येक वस्तूची गोष्टीची ही एक जागा असते . कसं आहे ना , अय्यप्पा पुजेच्या वेळी घातलेली पांढरी शुभ्र वस्त्रे ही पायसता आणि मांगल्य दर्शविते पण त्याच पांढराधोक रंगाची वस्त्रे घालून जेव्हा आपण एखाद्या मयताला जातो तेव्हा मात्र तीच शुभ्रता नैराश्य आणि दुःखाचं प्रतीक होते . एखाद्या सौंदर्यवतीच्या कपाळी रूळलेले केस. हे तिचं सौंदर्य तर खुलवतचं पण कवी मनाला भुरळ पाडून त्यांच्या कडून अप्रतिम अशा रचना करून घेत पण हेच केस  केशवपनानंतर त्या विधवेच्या अगतिकतेचं प्रमाण होतं. तशीच गोव-या जाळून धुपाटण्यात स्वामीपुढे किंवा इष्ट देवतांपुढे ओवाळून झालेली रक्षा .... राख .... ही आदराने आणि श्रध्देने आपणं ललाटी धारण करतो, पण जेव्हा त्याचं गोव-या एखाद्या प्रेताला भडाग्नी देताना वापरतात तेव्हा ती रक्षा घरातही घेतली जात नाही, तर दाराबाहेर ठेवून तिचे नंतर योग्य त्यावेळी वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते. आता या गोव-यांचच पहा ना, यांचा फक्त वापर कशा पध्दतीने होतो त्यावर त्यांची उपयुक्तता अथवा निरूपयोगीपण ठरतं. मित्रांनो, तसच आपलं ही आयुष्य आहे , गुरफटलेल्या भावना , मनाची गुंतागुंत सोडवण्याची वेळ ही सांजवेळ.... कातरवेळ .... योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य त्या पध्दतीने त्या भावनांचा गुंता सोडवला तर बरेचदा आयुष्यात आयुष्याचे बरेचसे पेच सुटतात , पण तेच जर विचारांचे, भावभावनांचे गुंतवळ मनात दाबून ठेवले तर कधी कधी भविष्यातच नव्हे तर वर्तमानातही आपल्याला कित्येक वादळांचे सामने करावे लागतात. 
     आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा पाठी मागे राहाव्यात सा-यांनी त्या वळून वळून पहाव्यात , समाजाने आपल्याला नावाजावं हे कुणाला आवडतं नाहीॽ त्याकरिता आपण प्रत्येकजण हा प्रयत्नशील असतोच नाही का ॽ पण आपले ते प्रयत्न योग्य त्या पध्दतीने योग्य त्या दिशेने जात असतील तरच त्यांचे सुयोग्य असे फळ आपल्याला मिळते . नाहीतर आपल्या त्या अथक परिश्रमाने जर नुकसान झाले तरी ते आपलेच होते. जन्माने एखाद्या जाती वर्णाचा लागलेला टिळा हा खरतर सर्वस्वी माणसाला माणसामाणसातील भेदाभेदात रूतवून ठेवतो . त्यात आपणं अडकून राहून आपल्या आयुष्याची माती करायची की अखंड तपस्येने, ज्ञान उपासनेने, सेवेने या जिवनाची ज्योत समाजाच्या आणि पर्यायाने आपल्या हितासाठी जाळायची की ज्याच्या तेजाने दशदिशा उजळून जातील हे ठरवणं हे आपल्याच हातात आहे नाही का ॽ 
        अस म्हणतात की, वेगवेगळ्या चौ-याअंशी लक्ष योनी जन्म घेतला की मग मानव जन्म मिळतो. मग समाजाच्या हृदय कोंदणात आपल्या अस्तित्वाचे अमृत थेंब हे सा-यांंनी सुरेल सुरांसारखे, घुंगुरवाळ्यासारखे जपायला नकोत काॽ धर्मांध वैशाख वणव्याच्या रणरणत्या दाहकतेने समाज रचना बदलून पहाणा-यांना ,  आपल्या राघव सावलीत, प्रेमळ अनवट मायेच्या चंद्रांमृतात नव्या बहरात सा-यांच्या आयुष्याचे देवचाफे जोजवले, फुललेले राहू देत, जेणेकरुन  सा-यांच्याच आयुष्याच्या फुलबागेत आपल्या पायी कायम प्रेमाची वात्सल्याची गंगा वाहात राहील  आणि मग आपल्या मृत्यूनंतर ही आपल्या शरीराची राख ही भस्म बनून सा-यांच्याच ललाटी मिरवली जाईल .

सौ ऋतुजा राजेश केळकर सिंधू वैभव पेपर 
ऋतूरंग लेखमाला 14 
गुरुवार 28.09.2023

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...