एका शाळेतील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले.तेव्हां शासनाने तालुक्यातीलच एका नविन शिक्षकाची नेमणूक केली.ते शिक्षक त्या शाळेत रुजू होण्यासाठी एस.टी.बसने निघाले, कंडक्टरला पैसे दिले.आणि ते जागेवर बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम शिक्षकाला परत केली.तेव्हां त्यांच्या असे लक्षात आले की,त्यात १० रुपये जास्त आले आहेत.
दुर्बद्धी ते मना ।कदा नुपजे नारायणा।।
शिक्षकाने असा विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे.आपण थोड्या वेळाने पैसे परत करुया,काही वेळ झाला तरी कंडक्टर अजुनही कामातच होता. शिक्षकाच्या मनात दुस-यांदा विचार आला की ,कंडक्टर घाईतच आहे.तर त्याला १० रुपये परत केले काय अन नाही काय त्याला काय फरक पडेल?१० रुपये आपणास लाभ झाला असे समजू.आपण याचा काहीतरी सदुपयोग करु. शिक्षकाच्या मनात असे द्वंद्व चालु असतांनाच शाळेचे गाव आले.एस.टी. तून उतरताना अचानक शिक्षकाचा हात खिशाकडे गेला आणि त्यातून १० रुपयाची नोट बाहेर आली व कंडक्टरला परत केली.व शिक्षक म्हणाले,अहो ! तुम्ही मला घाईगडबडीत १० रुपये जास्त दिले होते.
कंडक्टर हसुन म्हणाले,"गुरुजी! तुम्हीच या गावचे नवे शिक्षक आहात काय ?
शिक्षक हो म्हणाले. त्यावर कंडक्टर बोलू लागले,गुरुजी,मी मुद्दाम १० रुपये जास्त दिले होते.मला पहायची खुप इच्छा होती,की ज्या वर्गात राष्ट्र घडते.त्या वर्गाचा शिल्पकार जसा बोलतो,जसा शिकवितो,तसा आचरण करतो का ? म्हणुन मी मुद्दाम १० रुपये जास्त दिले होते.मला आता कळून चुकले आहे की या गावांने ही कोवळी मुलं ज्याच्या ताब्यात दिली आहेत.ती नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाहीत. गुरुजी मला क्षमा करा. एवढे बोलून कंडक्टरने बेल वाजवली. गुरुजींना आता घाम फुटला होता. गुरुजी आकाशाकडे पहात म्हणाले,ईश्वरा,१० रुपयाचा मोह मला किती महागात पडला असतां. देवा तु खरच दयाळू आहेस. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझी चाचणी घेतलीस आणि मला पात्र ठरवलंस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा