सोमवार, २१ एप्रिल, २०२५

1874. आई गेली आणि खऱ्या अर्थाने माहेर संपले

      ती जोपर्यंत असते तोपर्यंत कौतुक असते, आराम असतो, एक प्रकारचा निवांतपणा असतो. तिच्यावर आपले मुल सोपवून बहिणीबरोबर, मैत्रिणींबरोबर गप्पांचे फड रंगतात, भटकणे  सुरु होते. एक स्वातंत्र्य असतेच असते. ते कुठेतरी हरवले हे मात्र खरे. आई गेली आणि  त्या दिवशी "हे माहेर" संपले. 
सुट्टीला घरी आले की आवडणारा पदार्थ आवर्जून करणारी आई.
तुपाची/लोणच्याची/आवडत्या गुळाब्याची बरणी भरून बाजूला काढून ठेवणारी आई.
उशीरापर्यंत हाका न मारणारी आई...
"झोपा ग आता" खुसूखुसू करत बसू नका. असे सांगणारी आणि अलगदपणे आपल्यामध्ये सामील होणारी आपली आई.
दुपारच्या सुखदुःखाच्या गप्पा.. त्यात सुद्धा संसाराचे महत्व समजावून सांगणारी आई.
तडजोडी करूनच संसार करावा लागतो तरच तो आनंदाने होतो नाहीतर नाते तुटते. ते आपल्याला टिकवायचे आहे तोडायचे नाही.असे सांगणारी आई..
संसारात मन शांत ठेवावे..भांडण तंटा झाला तर विसरून जावा...
नवऱ्याचे चार चांगले गुण लक्षात ठेवावेत आणि आपल्या चांगल्या वागण्याने हळूहळू माणूस बदलतो हे शिकवणारी आई...
दुपारी जेवण झाले की आडवे होऊन सांगणारी आई...
मुलाला वाढवताना कसे वाढवावे हे शिकवणारी आई...
दुपारी गप्पा मारता मारता तिच्या पोटावर हात ठेवून झोपताना एक प्रकारच्या शांततेचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे.
तिची कितीतरी रूपे आहेत..
त्यानंतर हळूहळू संसारात रमायला सुरुवात झाली आणि "माहेर" ही जाणीव कमी होत गेली. कदाचित स्वीकारले असेल मनाने. ती गेली आणि तिच्याबरोबर इतकी वर्ष असणारी मावशी, मामा, भाउ ही माहेरची म्हणून आपली असणारी नातीही गेली..पुसली गेली आपल्या आयुष्यातून. जीच्यामुळे ती जोडलेली होती तीच्या जाण्याने ती नाती पण कुठेतरी हरवली आणि मागे राहिले एकटेपण, जे दरवर्षी सुट्टी लागली की प्रकर्षाने जाणवायचे. आजूबाजूच्या मैत्रिणी, मुलीबाळी माहेरी जाताना बघून आत कुठेतरी तुटायचे. वाईट वाटायचे. आपल्याला असे ठिकाण राहिले नाही म्हणून वाईट वाटायचे. 
पण हळूहळू माणूस सगळ्या गोष्टी स्वीकारतो. मुले मोठी झाली की आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते. आता मे महिन्यात जाणवणारा एकटेपणा..माहेर नसल्याचे दुःख कमी झाले आहे. तरीसुद्धा कुठेतरी आत त्याचा सल आहेच. लाड करून घ्यायला वयाची अट नसतेच मुळी. पण प्रत्येकीला एक हक्काचे माहेर मात्र असावे असे मला कायमच वाटत आले आहे. 
तो जिव्हाळा, आपलेपणा, कौतुक, आराम, कुठेतरी हवाहवासा वाटत असतो..
उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा आनंद हरवलाय एवढे मात्र खरे..
मामाच्या गावाला जाउया ही संकल्पना हळूहळू लुप्त होऊ लागलीय...
'माहेरी गेले होते महिनाभर'  हे कुणालातरी आनंदाने सांगायचे राहूनच गेले आहे...कित्येक वर्षात..

अज्ञात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...