गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1860. तोच खरं जगतो...!!

      कल्पना करा , तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून  जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहेत. तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक्य आहे. तुम्ही आसपास पाहता. ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथून कुठलाच ठळक मार्ग दिसत नाही. कुठे मोठे खडक आहेत, कुठे महाकाय झाडे आहेत आणि कुठे झुळझुळ वाहणारा झरा आहे.  अश्यावेळी मार्ग शोधण्याचा एकमेव उपाय म्हणजे चालणे होय. तो मार्ग शोधत तुम्हाला कायम अवतीभवती पहात जोवर योग्य मार्ग दिसत नाही तोपर्यंत चालत राहावं लागणार आहे. जर थांबलात तर मार्ग कधीच मिळणार नाही.  बऱ्याचदा तुम्ही अश्या वाटांवर जाता जिथून तुम्हाला परत येणं भाग पडतं, बरेच पर्याय सुरवातीला योग्य वाटतात पण ते पुढे जाऊन चुकीचे ठरतात. म्हंटलं तर प्रत्येक दिशेला जाऊ शकता तरी एकाच दिशेला जाण्याशिवाय पर्याय नसतो. अश्या वेळी ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग शोधावा लागेल आणि तो एकमेव मार्ग शोधणे म्हणजे काय तर प्रथम अपयशी होणं ! काही भाग्यवान लोकांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात मार्ग लगेच सापडेल. परंतु बहुतांश लोकांसोबत तसे घडत नाही. आपल्याला पहिल्यादा धाडसाने एक दिशा निवडावी लागते, एका मार्गावर जावे लागते, जमेल तसं adjust करावं लागतं , प्रसंगी चार पावलं मागे येऊन पुन्हा पुढे जावं लागतं. एवढं करूनही कधी कधी आपल्याला पाहिजे ते ठिकाण सापडतच नाही , वेगळेच काही हाती लागतं. त्याचाही आनंद घेऊन पुन्हा नव्याने प्रयत्न करावा लागतो. 
       आपण आयुष्यात असे अनेक प्रश्न हाताळत असतो. व्यवसाय कोणता करावा ? करावा की करू नये ? कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? आहे ते करिअर बदलावे की नाही....असे अनेक निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळी मित्रानो, लक्षात ठेवा की तुम्ही एका जंगलाच्या मधोमध उभे आहात , ज्याचा कोणताही नकाशा नाही. फक्त आपल्याला बेस्ट वाटेल त्या दिशेला एक एक पाऊल टाकत राहणे आणि वेळोवेळी आपला मार्ग,दिशा, वेग adjust करत राहणे हाच एकमेव उपाय आहे . 
      पण तुम्हाला सांगू मित्रानो, जेव्हा आपण अशा वाटा शोधत असतो तेव्हा आपोआप मागे पाऊलखुणा ठेवत जातो. त्याच्याच पुढे पाऊलवाटा होतात. आपण आपला मार्ग स्वतः बनवत जातो. तुमचा मार्ग बेस्ट नसेल, जलद नसेल, सोपा नसेल...पण तो तुमचा स्वतःचा असेल. प्रत्येक प्रयत्नात , प्रत्येक चुकीच्या वळणावर शिकलेला धडा तुम्हाला पुढे मदत करेल आणि हीच प्रोसेस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल !  आणि शेवटी प्रवासच अंतिम स्थानावर पोहोचण्यापेक्षा जास्त आनंद देऊन जाईल ! या प्रवासासाठी, अनोळखी वाटा शोधण्यासाठी, पुन्हा पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी जो जगतो. तोच खरं जगतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...