आत्महत्या केल्यानंतर खाली येऊन पाहिले मी माझ्या घरच दृश्य..
वेड लागले वडिलांना,
स्वतःच्या कानफाटात मारून घेतात.
फोटोकडे बघून माझ्या,
स्वतःलाच फार शिव्या देतात.
केस सोडून फिरते आई.
वेडी झाली म्हणते गांव.
तीला कोण तुम्ही विचारले?
तर माझेच सांगते नाव.
उदास आणि निस्तेज चेहरा,
बायकोचा माझ्या बघवत नाही.
चेहऱ्यावरती हास्य तिच्या,
पुन्हा कधीच येणार नाही.
तसे कारण मोठे नव्हते,
माझ्या त्या मरण्याचे.
मलाच नव्हते भान तेंव्हा,
असे काही करण्याचे.
रेल्वेखाली झोपलो,
तुकडे झाले क्षणाला.
घरचे म्हणतात गोळा करून,
आणले तरी कोणाला?
पाहून हे सारं,
पुन्हा मी मारत आहे.
चिमुकली पिल्लं माझी,
हल्ली फार झुरत आहेत.
आत्मा नुसता भरकटतोय,
परत येता येत नाही.
त्या वडिलांची माफी मागायची,
संधीही देव आता देऊ शकत नाही.
मी एकदाच मेलो.
पण घराचे रोज मरत आहेत.
माझ्या फोटोसमोर बसून
विनवण्या करत आहेत.
चुकला माझा निर्णय देवा,
माफी एकदा देशील का?
पुन्हा एक शरीर देऊन,
माझ्या घरी मला नेशील का?
वडीलांना बिलगून रडावं म्हणतो,
आईच्या पाया पडावं म्हणतो.
आयुष्याला न घाबरता देवा,
पुन्हा एकदा लढावं म्हणतो.
देवा पुन्हा एकदा घडावं म्हणतो.
तर यावरून एक लक्षात घेतलं पाहिजे, कोणत्याही वाईट परिस्थितीला आत्महत्या हा पर्याय कधीच होऊ शकत नाही.
- श्री. संकेत म्हात्रे, श्री. निखिल पाटील, श्री. विठ्ठल पाटील, श्री. पंकज शिंदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा