बुधवार, २४ मे, २०२३

353. परतफेड

"कसे आहात ?"
एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो.
तो म्हणाला  "भरपूर रडून घ्या, मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही ".
त्या नंतर त्याने जे काही सांगितलं. त्यामुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला.
त्याने काय सांगितलं ?
तो शांतपणे म्हणाला  "की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही" किंवा नसावा  कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा."
"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी."
जसं तुमचा आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.तो अकाउंट तुमचा संपला ! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा.
सख्ख्या भावाने बोलणे थांबवले घरी येत नाही,वहिनी बोलत नाही,सख्ख्या बहिणीने नाते तोडले किंवा आपली लाडकी लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले घरी सुध्धा कळवले नाही, मित्राने वाईट वागणूक दिली ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुमची सुटका या जन्मातून नाही,
तेंव्हा मनातल्या मनांत सुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का जगवलंस ?" हा प्रश्न विचारू नका. जे झाले ते चांगले झाले,जे होईल ते चांगले होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जिवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.
कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली. तुमचा अपमान केला, तुमच्या कडे दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकरांचं कोणाला विस्मरण झालं "तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा.
बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  'Account Closed ' असा शिक्का मारतात ना  त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती 'Account Closed' झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा एक ही क्षण टाळू नका.
कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं.
तेंव्हा मनाला सांगा "बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं. तुझ्या हुकमात राहिलो. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून तुला मी मुक्त केलं!"
किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा.
कोणाला किंवा परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त "परतफेड आणि परतफेड" हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल.
आणि मी येतो असं म्हणत तो निघून गेला.
"तुम्ही सहन करतो, सहन करतो." हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असतात."
"जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही.!"
आयुष्यात कोणा कडुन अपेक्षाभंग करुन घेण्या ऐवजी फक्त "परतफेडीचं" आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवु या. चांगल्या गोष्टींची सुरुवात लगेचच करायची. काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत, माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत, वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत, पावलं अडखली तरी चालणं नाही थांबत, अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत, बोलणं नाही झालं तरी आठवण नाही थांबत.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...