बॅड पॅच म्हणजे वाईट काळ ! ज्योतिषी साडेसाती म्हणतात, तसाच. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते. नड येते. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं. हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षही रेंगाळतो. तो आपलं आयुष्य अंतर्बाह्य हादरवून टाकतो. आयुष्य नकोसं करुन सोडतो. आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतोच. संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो. अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो. कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात.
यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:
१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही, हे बॅडपॅच असतानाच कळतं. आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं, हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं.
२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते. अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो, हे आपलं आपल्याला समजू शकतं. आपली शक्तिस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते.
क्रिकेटर, व्यापारी, कलाकार, राजकारणी, सामान्य माणसं असे कोणालाच यापासून वाचता येत नाही. मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला काही तरी शिकवून जातो. यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते.
अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही. पण तो जेव्हा येतो तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, react कसं करायचं हे आपल्या हातात असतं. आपला बॅडपॅच आहे नाकारून, उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं की तो स्विकारून नम्र व्हायचं, आत्म परीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं. असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमीत कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतील त्यामधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो. संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच. प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो. शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो. तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच. तुम्हाला जर कुणी प्रगती पासून रोखू शकतो, तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतःच असता. कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे, हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
मी गरीब आहे. पैसा नाही, हे नाही, ते नाही, म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबूत करा, मजबूर नाही. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, अडवले, थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा 🏃 मार्ग सोडू नका..
फक्त स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा.. बस्सससससससस...!
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा