गुरुवार, ११ मे, २०२३

320. अशीही एक समाजसेवा...

        परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुणखाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावून पाहत राहायचा.  मृत्युच्या दारात उभं राहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावरील दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने होणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूप अस्वस्थ व्हायचा. बहुसंख्य रुग्ण बाहेगावाहून आलेले गरीब लोक असायचे. कुठे कोणाला भेटायचे, काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषध पाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहून तो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. रात्रंदिवस त्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला आणि एक दिवस त्याने त्यातून मार्ग काढलाच. 
          आपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे २७ वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन देता देता शंभर, दोनशे, तीनशे अशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हात त्यांच्या सोबतीला येऊ लागले. बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली. कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर कधी मुंबईतला भयंकर पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू शकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजन घेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढे गेली होती. हरखचंद सावला एवढं  करूनच थांबले नाहीत. त्यांनी गरजू रुग्णांना मोफत औषध पुरवायालाही सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी औषधाची बँकच उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमच त्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बाल रुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकहि उघडली. आज त्यांनी स्थापन केलेला "जीवन ज्योत" ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७ वर्षीय हरखचंद सावला आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांच्या त्या अफाट उत्साहाला, त्यांच्या त्या प्रचंड कार्याला शतशः प्रणाम !
        २४ वर्षे क्रिकेट खेळून २०० कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामने खेळून १०० शतके अन ३० हजार धावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पण २७ वर्षात १०-१२ लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकाना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावलाना मात्र कोणी ओळखतही नाही आणि त्यांना देवमाणूस मानत नाही. कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात, कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात, तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात. आणि नाही जमलंच तर जवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोध घेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधी सापडेल का हे माहित नाही? तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण आपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो. आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू, कधी महाराज, कधी बाबा म्हणून त्यांच्या मागे पळत असतो आणि आपल्या व्यथा, वेदना, आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत. गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाइकांना मात्र देव सापडला तो हरखचंद सावलाच्या रुपात.  जसे चारोळी, कवीता, जोक, इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा. अशा माणसाचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना प्रसिध्दि मिळाली पाहीजे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...