शनिवार, ३ जून, २०२३

386. वटसावित्री !

      नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्‍न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही.  सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा!  विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?  कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर. मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,  मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही? कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तर मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता? बिचारीजवळ उत्तर नव्हते. अनेकांजवळ नसते. शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका.
     जगात सर्वात दाट सावली असते वडाची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-
 कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌
 शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌
 अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता.  वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.  ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा. 
         ती म्हणाली याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट. सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे.  जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो. संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.  १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह. असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत. शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.  आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...