काल एका मेडीकल स्टोअरवर औषधी घेण्यासाठी मी उभा होतो. एवढ्यात अंगावर सामान्य कपडे घातलेला, दाढीचे खुंट वाढलेला एक खेडूत वृद्ध औषधांची चिठ्ठी घेवून तेथे आला. दुकानदाराने प्रिस्क्रिपशन पाहून एक औषधी पावडरचा मोठा डबा काऊंटरवर ठेवला.
"350 रू....." तो म्हणाला.
वृद्ध व्यक्तीने सद-याच्या खिशातुन पैसे काढले. ते जेमतेम 310 भरले.
" एव्हढेच आहेत.....बाकीचे नंतर देतो....आम्ही दवाखान्यातच आहोत !"...तो म्हणाला.
दुकानदाराने त्याच्याकडे कुत्सित नजरेने पहात दणक्यात डबा उचलून कपाटात ठेवला. बाबा अस्वस्थ झाला.
काय करावे त्याला समजेनां. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. जवळच उभ्या असलेल्या एक सदगृस्थाने तात्काळ सांगितले. " उरलेले पैसे माझ्या बिलातून घ्या....द्या त्यांना तो डबा !" दुकानदाराने डबा पुढ्यात ठेवला, पैसे घेतले.
" दादा, बाळाला कसं द्यायचं हे पावडर....
तो तर अजून दोन दिवसांचाच आहे ? वृद्धाने चौकशी केली.
" बाबा, हे बाळासाठी नाही.....त्याच्या आईसाठी आहे."
" असं होय, मग वाईच राहू द्या....मी नंतर घेतो."
म्हणत म्हतार्याने डबा परत केला. दुकानदार पुन्हा चिडला. ..पैसे परत करत त्याने रागाने म्हातार्याकडे पाहिले व डबा परत ठेवला. वृद्धाने जास्तीचे पैसे त्या गृहस्थाला परत केले व चालू लागला. मी त्यांच्यासोबत चालत त्यांना विचारलं....
" कां परत केला बाबा डबा...?" चेहर्यावरचा घाम पुसत ते म्हणाले...
"अहो, मले वाटलं तो लेकरासाठी आहे..... म्हणून घेत होतो... .त्याच्या आईला काय ?.... .ती आता बरी आहे...
उद्या बाळाला काही औषध लागलं म्हणजे कुणाकडे हात पसरायचे ?"
मी आवाक झालो. माझ्या मनात प्रश्न फेरधरुन नाचू लागले. परीस्थीने माणूस किती हिशोबी होतो ? त्याचे प्राधान्यक्रम कसे बदलतात ? प्रेमाचा प्रवाह कसा झटक्यात दिशा बदलतो ? लेकीवरचं त्याचं प्रेम कमी होतं कां ?गरीबीपुढे माया, ममता कशी आगतीक होते ? .या व अश्या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या. हजारो, लाखोंची उलाढाल करणार्यांसमोर सामान्य माणसांच्या गरजा किती माफक असतात. त्या बाबांची अडचण किती गंभीर होती व नड किती शुल्लक होती. त्यांनी त्यावर संयमाने किती सहज मार्ग काढला. परीस्थीतीचा बाऊ नाही, दुकानदारावर राग नाही, व्यवस्थेविरुद्ध त्रागा नाही. आहे ती परीस्थिती
स्विकारुन बाबांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले होते. माय महत्वाचीच, पण त्या स्थितीत त्यांना लेकराची अधिक काळजी होती. तो डबा लेकरासाठी असता तर कदाचित त्यांनी तो घेतलाही असता. प्रसंगी दुसर्याकडून मदत मागितली असती. याचनाही केली असती. मात्र, आईला तूर्त गरज नाही हे त्यांनी काढलेलं निदान. कदाचित ते आगतिकतेतून आले असेल. माय, ममता आणि आगतिकता यांचा विचार करतच मी एका वेगळ्याच तंद्रीत चालत होतो.
" ओ साब, रास्ता छोडो.....बीच रास्तेमे क्यो चल रहे हो ?" रिक्क्षावाल्याच्या उद्दाम सूचनेने मी भानावर आलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला होत माझी नजर त्या म्हातार्या बाबांचा शोध घेवू लागली. ते मात्र, हाॅस्पिटलच्या गर्दीत सहज मिसळून गेले. काहीच घडलं नाही या अविर्भावात .मी स्वतःशीच म्हणालो. "ह्याला जीवन ऐसे नाव" To help poor is serve humanity.
ज्याप्रमाणे देवाला दानधर्म करत आहात त्याचप्रमाणे समाजातील खरे गरजुवान शोधून त्यांच्या साठी काहितरी करा. यालाच म्हणतात सत्पात्री दान. प्रत्येकाचे दिवस येतात त्यामुळं इतरांना मदत करत चला. परमेश्वर तुम्हाला कधीच कमी करणार नाही.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा