गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

928. तृप्तता

     ते दोघे मूळचे नागपूरचे, सध्या पुण्यात कॉट बेसिसवर राहायला. सगळं रुटीन ठरलेलं. सकाळी लवकर उठून आवरायचं. नायतर टॉयलेटला गर्दी होते. मग कोपऱ्यावर जाऊन नाश्ता करायचा. कधी पोहे, कधी उपमा, साबुदाणा खिचडी, ब्रेड पॅटिस, अगदीच कंटाळा आला की इडली, वडा सांबार. एक कडक चहा. तिथून सरळ ऑफिसमध्ये. १ ला डबेवाला येणार. मग लंच, ४ ला चौकात जाऊन चहा. ६ ला हॉस्टेल. मोबाईल कुटणे, घरी फोन करणे, इस्त्रीचे कपडे आणणे, येताना एखादा कटिंग, क्रीमरोल नाहीतर वाटी केक. ९ ला डबा येईल की डिनर. रात्री बेडवर आडवं पडून एखादा सिनेमा, तोही अर्धवट. ११ नंतर कधीही झोप. सगळं अगदी ठरलेल्या प्रमाणे. खरं तर तेच तेच खाऊन, धोपट मार्गाने जाऊन दोघांना प्रचंड कंटाळा आला होता. गोडधोड खावं, माणसांत मिसळून जावं, मनाला शांतता मिळावी असं आतून वाटत होतं. जसं कॉलेजमध्ये असताना अनोळखी लग्नात किंवा कार्यात जाऊन मस्त पोटभर जेऊन यायचं, असलं काहीतरी शिजत होतं.
       रविवार होता. सकाळी निवांतपणे आवरून चक्कर मारायला बाहेर पडले. जवळच एक छोटा कार्याचा हॉल होता. लगबग दिसली, गजरे, लफ्फे नेसलेल्या बायका, झब्बे सुरवर, जॅकेट, पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी घातलेले बापे. परकर पोलक्यात आणि शिवलेल्या धोतरात बारकी पोरी पोरं. च्या डोक्यात सोडियम व्हेपर लागला. गडी खुश. रूममध्ये येऊन कुर्ता, सुरवर घातला, डिओ ने अंघोळ केली. अहहह, वऱ्हाडी जणू. शून्य मिनिटात हॉल गाठला, सहजपणे दरवाजातून आत गेले. दारात एक तरुण उभा होता, अर्थातच यजमान घरातला. यांनी नमस्कार केला. त्यानेही नमस्कार केला. आत गेले.
हा तरुण त्यांच्या मागे गेला, म्हणाला "तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे, तुम्ही कोणाकडून आहात?....."
यांची किंचित टरकली. तरी ध्येयवादी होते त्यामुळे बिनधास्त सांगितलं, " मुलाचे मित्र आहोत."
"ओहहहह या या" म्हणत त्या तरुण मुलाने त्यांना बसायला सांगितलं.
हे बोलणं संपलं.गुरुजींची आरोळी झाली, "ज्यांना पथ्यपाणी असेल त्यांनी जेऊन घ्यावं, मुहूर्ताला वेळ आहे." एक हशा पिकला, सत्तरीच्या पुढची बरीच यंग इंडिया तिथे होती. तशी मोजकीच माणसं उपस्थित होती, तीन पिढ्या एकत्र दिसत होत्या. हे दोघे मागे थांबले होते. अगदीच दगा फटका झाला तर कन्नी कापायची.
       तो तरुण त्या दोघांच्या जवळ गेला, म्हणाला, "तुम्हाला घाई असेल तर वरच्या हॉलमध्ये जेवायची सोय केली आहे, मुहूर्ताला वेळ आहे, तुम्ही जेऊन घ्या."
 "नको नको, आहे वेळ अजून. लग्न लागलं की जेवू...."
 "अहो ऐका माझं, जेऊन घ्या...."
     हो, नाही करत हे दोघे जेवायला गेले. मोजक्या पदार्थांचा बुफे मांडला होता. सनईचे सूर, उदबत्तीचा घमघमाट होता. वरण, भात छोटा बटाटावडा आणि हिरवी चटणी, सफरचंदाची कोशिंबीर, मटार उसळ अळणी आणि तर्री वाली, पोळी, दही बुत्ती, सीताफळ रबडी. अहहहहह कसला साधा पण रुचकर मेन्यू आहे असं म्हणत, पान वाढून घेऊन, टेबल खुर्चीवर आसनस्थ झाले.
"ए पाणी पिऊन घे रे, म्हणजे रबडी ओरपता येईल..."
"एक, दोन, तीन, चार....."
"ए अस मोजू नये रे," असले डायलॉग मारून, तड येइपर्यंत यथेच्छ जेवले, हात धुवून बनारस पान तोंडात.
तो तरुण इतर पाहुण्यांशी बोलत पुन्हा त्यांच्यापाशी आला. "काय पोटभर झालं ना जेवण?? सगळं ठीक आहे ना?" 
     इतकं आदरातिथ्य बघून या दोघांना गलबलून आलं, तोंडातले पान एका गालात सरकवून. "वाह अगदी मोजके पदार्थ पण अप्रतिम चव आहे, तृप्त झालो" अशी पावती दिली.
 तो तरुण म्हणाला, "चला आता मुहूर्त आला...."
 जवळपास वरचा हॉल खाली आला. गुरुजींनी आरोळी दिली, "नवरा मुलगा आणि नवरीला आणा."
      सर्वत्र हशा पिकला. या दोघांनी एकमेकांकडे बघितलं. काही कळायला मार्ग नाही. तो तरुण या दोघांच्या मागे उभा राहिला. स्टेजवर नवरा मुलगा, मुलगी आले. लग्नी कपडे, मुंडावळ्या, हातात हार. मंगलाष्टके झाली, सगळ्या मंडळींना कौतुक होतं या सोहळ्याचं. मुहूर्तावर लग्न लागलं. हार घातले गेले. सर्वांच्या कडे तोंड करून दाम्पत्य उभं राहिलं. ७५ गाठलेला वर. सत्तरीची वधू. गोड दिसत होते दोघे.
         त्यांना बघून हे दोघे अवाक झाले होते. हे काय भलतंच सुरू आहे, पोबारा करायची वेळ आली आहे, असं मनात आणत होते. इतक्यात तो तरुण, या दोघांना मागून म्हणाला, "नवरदेव तुमचा मित्र आहे ना. मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून आज पुन्हा तसाच सोहळा केला. तुम्ही आत आलात आणि म्हणालात की नवरदेवाचे मित्र आहोत. तेव्हाच मला समजलं की तुम्ही आमच्या कोणाचेच कोणी नाहीत. पण काळजी करू नका, तुमचा हेतू मला कळला. मी पण याच वयात आहे."
       आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देव कोणत्या रुपात येईल सांगता येत नाही आणि भोजनाने तृप्त झालेल्या माणसांचे आशीर्वाद, माझ्या आई वडिलांना मिळाले आहेत, यात मला समाधान आहे."
      काय बोलावं हे न समजता, त्या दोघांनी त्या तरुणाचे आभार मानले आणि नमस्कार करून बाहेर पडले, तृप्त होऊन आणि एक प्रकारची मानसिक शांतता त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर होती.

©️ पराग दामले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...