शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

915. ॐ नमःशिवाय

   भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी रथसप्‍तमी हा सण साजरा केला जातो. हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. 

रथसप्‍तमी ,रथसप्तमी चे महत्त्व,  
    सर्व संख्यांमध्ये `सात’ या अंकाचे महत्त्व विशेष आहे. `सात’ या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादि सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्‍तमी या तिथीला शक्‍ति अन् चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्‍ति, आनंद आणि शांति यांच्या लहरी २० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्‍तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतिसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात.

रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन !
‘माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, तो हा दिवस. भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्‍वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणार्‍या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. ‘श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत’, अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणार्‍या तापमानाचा दर्शक असतो, तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक असतो. कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा सण. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशी चुलीवर जळलेली खीर प्रसादरूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले, तर त्याची सिद्धता हवी. याची आठवण करून देणारा हा सण. 

सूर्योपासनेचे महत्त्व आणि इतर माहिती
सूर्याच्या उपासनेने जिवाला स्वत:मधील सूक्ष्म-तेजतत्त्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जिवाने तेजतत्त्वाच्या `ॐ’ काराची उपासना करणे उपयुक्‍त ठरते. त्याचप्रमाणे गायत्रीमंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरश्चरण करणे फलदायी ठरते. सूर्योपासनेने जिवाच्या मनाची एकाग्रता वाढते. नेत्र हे तेजतत्त्वाशी निगडीत असल्याने सूर्योपासनेने (तेजतत्त्वाच्या उपासनेमुळे ) जिवाला दिव्यदृष्टि प्राप्‍त होते.

१. सूर्योपासनेचे महत्त्व
भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म यांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधःकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. (उपासनेमुळे मूर्ती जागृत होते, तसे हे आहे.) 
अ. सूर्योपासनेमुळे जिवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते.
आ. सूर्याच्या उपासनेने सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता ३० टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता २० टक्क्यांनी वाढते.
इ. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले, तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे, हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे.
ई. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते.
उ. पंचतत्त्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे (तेजतत्त्वाची उपासना करणे), हा महत्त्वाचा टप्पा आहे.
ऊ. योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायामप्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान २० वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते. सूर्यनमस्कारामुळे शरिरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ साहाय्य हाते.

२. सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन
सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्‍त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गति आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे. त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेजतत्त्व हे आजूबाजूला ३० टक्के प्रक्षेपित होत असते. श्रीविष्णूच्या कृपाशीर्वादामुळे अन् तेजतत्त्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षककवच निर्माण झालेले असते. त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्‍ती अडथळा आणू शकत नाहीत. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहनच आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्‍त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे `रथसप्‍तमी’ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.
३. सूर्याच्या सारथ्याचे गुण
अरुण हा सूर्याचा सारथी आहे. त्याच्यात सूर्याचे ४० टक्के गुण अहेत. तो केवळ एकाच डोळयाने पाहू शकतो. `एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे’, हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात.
४. सूर्यलोक
स्वर्गलोकाच्या बाजूला सूक्ष्म-सूर्यलोक आहे. सूक्ष्म-सूर्यलोकात पंचमहाभूतांपैकी सूक्ष्म-तेजतत्त्वाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. दिव्य प्रकाश, अग्नि आणि अग्नीच्या ज्वाळा दिसणे आणि उष्णता जाणवणे हे तेजाचे स्थूलरूप आहे. त्यांची अनुभूति सूर्यलोकात येते. अनेक जिवांची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यांना सूर्यलोकात जाता येत नाही. पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तेजतत्त्वाची उपासना करता येत नाही. पर्यायाने तेजतत्त्वाचे स्थूलरूप, म्हणजे दिव्य प्रकाश, अग्नि आणि उष्णता सहन होत नाही. सूर्यलोकात स्थान मिळण्यासाठी सूर्यदेवतेचे गुण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आणि जिवाची पातळी किमान ५० टक्के असणे अपेक्षित आहे.
सूर्याचे गुण
१. नित्योपासना : सूर्याची ऋषींप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते.
२. शिस्त : सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो.
3. त्याग : सूर्य स्वत:च्या जवळील तेज, ऊर्जा आणि चैतन्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते.
४. समष्टिभाव : सूर्य हा त्याच्याकडील तेज आणि ऊर्जा त्याच्या लोकापुरती मर्यादित न ठेवता विविध लोकांतील जिवांनाही प्रक्षेपित करतो. त्यासाठी तो सतत भ्रमण करीत असतो. समष्टि भाव जास्त असल्यामुळे त्याच्यात उच्च देवतांचे २० टक्के गुण आहेत.
५. ज्ञानदान आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे : ज्ञान म्हणजे प्रकाश होय. प्रकाश हे ज्ञानाचे एक रूप आहे. सूर्य ज्ञानासंदर्भातही कार्य करतो. त्यामुळे त्याच्याकडून सूक्ष्म अशा ज्ञानलहरी आणि ज्ञानप्रकाशलहरी प्रक्षेपित होत असतात. या ज्ञानलहरींच्या माध्यमातून तो ३० टक्के इतके ज्ञान देऊ शकतो. कर्णाला सूर्यदेवता रोज दर्शन देत असे आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असे. याचा महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.
६. उत्तम गुरु : सूर्य शास्त्र आणि शस्त्रकला या दोन्हींमध्येही निपुण आहे. या दोन्ही कला अवगत करण्यासाठी रुद्रावतार मारुति सूर्यलोकात गेला होता. तेव्हा त्याला सूर्याने `गुरु’ म्हणून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तो इतरांना ज्ञानप्रकाश देऊन त्यांच्या जीवनातील स्थूल आणि सूक्ष्म अहंकाररूपी तिमिर नष्ट करतो.
७. उत्तम पिता : सूर्याने त्याचे पुत्र आणि पुत्री यांच्यासाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये वेळोवेळी पूर्ण केली. ब्रह्मांडातील सर्व जिवांप्रति तो पित्याच्या दृष्टीनेच पहातो आणि त्यांना मदत करतो.
८. व्यापकत्व : ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज, ऊर्जा आणि चैतन्य देत असतो.
९. समभाव : सूर्य सर्वच जिवांकडे समदृष्टीने पहातो. तो गुणग्राहक आहे. त्यामुळे तो कोणावरही अन्याय करत नाही. याचे उदाहरण म्हणजे मारुतीमध्ये शनीच्या तुलनेत शिष्याचे गुण जास्त प्रमाणात असल्यामुळे सूर्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि ज्ञान आणि विविध विद्या दिल्या.
१०. क्षात्रभाव : इंद्र हा सर्व कनिष्ठ देवतांचा प्रमुख आहे. सूर्यदेवता इंद्राच्या अधिपत्याखाली असली, तरीही इंद्राने अयोग्य निर्णय दिल्यावर ती त्याला विरोध करते आणि इंद्राच्या अयोग्य आज्ञेचे पालन करत नाही. पुढे येणार्‍या वाईट काळात (धर्मयुद्धाच्या वेळी) कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवता ही क्षात्रवीर आणि धर्मवीर साधकांना आणि धर्माच्या बाजूने लढणार्‍यांना सर्वाधिक प्रमाणात मदत करील. कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवतेमध्ये सर्वाधिक सात्त्विकता, व्यापकत्व, त्याग, समष्टि भाव आणि क्षात्रभाव असतो.  प्रभु श्रीराम सूर्यवंशी असल्याने रामराज्याची स्थापना करू शकणे
सूर्याच्या गुणांमुळे त्याच्या राज्यात (लोकात) पितृशाही असते. सूर्योपासकात वरील गुण असले, तरच त्याला सूक्ष्म-सूर्यलोकात स्थान मिळते. सूर्याची उपासना करणार्‍यांना आणि सूर्याचे गुण अंगी असणार्‍यांना `सूर्यवंशी’, असे संबोधले जाते. प्रभु श्रीराम हा सूर्यवंशी होता. त्यामुळे तो आदर्श पिता आणि आदर्श पुत्र होण्याबरोबरच रामराज्याची (पितृशाहीची) स्थापना करू शकला. ‘भारत’ हे सूर्याचे एक नाव असणे. सूर्य हा देवता, ऋषीमुनी आणि मानव या सर्वांनाच पूजनीय आहे. हिंदु धर्मात सूर्याला विशेष महत्त्व आहे. भारतीय पंचांगातही चंद्रापेक्षा सूर्याला जास्त महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. ‘भारत’ हेदेखील सूर्याचेच एक नाव आहे. ‘स’ हे सूर्याचे, म्हणजेच तेजाचे बीजाक्षर आहे. 

सूर्याच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या संदर्भातील माहिती
स्थूल सूक्ष्म
१. उत्पत्तीच्या संदर्भातील माहिती सूर्यदेवतेपासून यम आणि शनि या देवता पुत्ररूपाने, तर तपी अन् यमी या देवी पुत्रीच्या रूपाने निर्माण झाल्या. यमीपासून यमुना नदीची निर्मिति झाली, तर तपीपासून तापी नदीची निर्मिति झाली. अ. सूर्यमंडलातील ग्रह अन् नक्षत्रलोक, शनिलोक आणि ग्रहलोक या सर्व उपलोकांची निर्मिति सूर्यापासूनच झाली आहे.
आ. तेज, तेजयुक्‍त चैतन्य आणि केवळ पहिल्या स्तराच्या चैतन्यापैकी ३० टक्के चैतन्य हे सूर्यापासून निर्माण झाले आहे.
इ. सुदर्शनचक्र, सूर्यास्त्र, तेजतत्त्वाशी संबंधित बाण आणि अस्त्रे यांची निर्मिति सूक्ष्म-सूर्यापासून झाली आहे.
ई. सूर्याने त्याचे तेज देवतांची विविध शस्त्रे आणि अस्त्रे यांना प्रदान केले आहे. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे दिव्य अन् तेजस्वी दिसतात.
२. स्थितीच्या संदर्भातील माहिती सूर्यदेवता दररोज स्थूलातील सूर्याच्या रूपाने येऊन ब्रह्मांडातील विविध ग्रहांना आणि जिवांना ऊर्जा आणि प्रकाश देते. अशा प्रकारे सूर्यदेवता त्यांचे संगोपनच करते.
3. सूर्यदेवतेकडून स्थूलातून प्रक्षेपित होणारा प्रकाश आणि ऊर्जा यांच्याबरोबरच मोठ्या प्रमाणात चैतन्यही प्रक्षेपित होत असते. त्या चैतन्यामुळे अनेक जिवांना साधना करण्यासाठी शक्‍ति मिळते. तसेच त्यांचे मन आणि बुद्धि यांवरील आवरण कमी होऊन त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होते.
४. लयाच्या संदर्भातील माहिती सूर्याच्या उष्णतेने सरोवरे आणि नद्या यांतील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. त्यामुळे अनेक वेळा नद्या आणि सरोवरे सुकून जातात. अति उष्णतेमुळे अनेक वनस्पती जळून जातात, तसेच जिवांनाही त्रास होतो अन् काही जण मृत्यूमुखी पडतात. सूर्याचा प्रकाश आणि उष्णता यांमधून सूर्याचे सूक्ष्म-तेज प्रक्षेपित होत असते. या सूक्ष्म-तेजामुळे सूक्ष्मजंतू आणि रज-तमात्मक सूक्ष्म-जिवांचा नाश होतो. त्यामुळे वायुमंडलातील रज-तमाचे प्रमाण कमी होऊन सात्त्विकता वाढते अन् त्रिगुणांचा समतोल राखला जातो. सूर्य उगवल्यानंतर तो दिवसभर आकाशात असतो आणि सायंकाळी त्याचा अस्त होतो. सूर्याचे हे उत्त्पत्ति, स्थिति आणि लय यांचे कार्य अनुक्रमे सुरू असते. शरीरबळ, मनोबळ आणि आत्मबळ वाढवणारे सूर्यनमस्कार. रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. आरोग्यं भास्करात् इच्छेत् । म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले, तर काय बिशाद आहे गुंडांची आक्रमण करण्याची. शरीरबळ आणि मनोबळ वाढवण्याचे सामर्थ्य या नमस्कारांत आहे. जर हे समंत्र घातले गेले, तर आत्मबळसुद्धा वाढते.

जीवनाचा मूळ स्रोत असलेला सूर्य 
सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे. सूर्यकिरणांतून शरिराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. काळाचे मोजमाप सूर्यावरच अवलंबून आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. तो स्थिर असून अन्य सर्व ग्रह त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. 

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवीचे (म्हणजे सूर्याचे) महत्त्व 
ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवि (म्हणजे सूर्य) हा आत्माकारक आहे. ‘मानवी शरिरातील प्राण, आत्मिक बळ आणि चैतन्यशक्ती यांचा बोध रवीवरून होतो’, असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवि जितका बलवान, तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्त्वनिष्ठता, कर्तृत्व, सन्मान, कीर्ती, आरोग्य, वैद्यकशास्त्र इत्यादींचा कारक रवि आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार दर्शवतात. रथाला असणारी बारा चाके बारा राशी दर्शवतात. हिंदु संस्कृतीचा प्राण असणार्‍या भगवान सूर्यनारायणाची विविध फलदायी सूर्योपासना. सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहोत. रथसप्‍तमीचा दिवस म्हणजेच तेजोपासनेचा दिवस. या दिवशी सूर्याच्या किरणांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. ज्या वेळी त्यांचा पृथ्वीच्या अंतरिक्ष कक्षेत प्रवेश होतो, त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतो. त्यामुळे किरणातील तेज मवाळता धारण करते. हे तेजरूपी किरण आपतत्त्वात्मक लहरींच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायूमंडलात प्रवेश करतात.
    ॐ नमःशिवाय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...