शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

290. साठीच्या व्यथा, पिंजऱ्यातील बाप

         प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने बहुतेक घरात साधारण हीच परिस्थिती असते.बहुतेक सगळेच बापांना नेहमीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातात, आणि त्यांच्यावर विविध कलमांखाली आरोप ठेवले जातात. घरोघरचे आरोप त्याच त्या स्वरुपाचे असतात आणि बहुतेक बापांना हे समजतच नाही की ,आपण तर अनेक गोष्टी ज्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी  करताना आयुष्यभर स्वत:लाच शिक्षा देत आलो, त्यांनीच का बरं आपल्यावर आरोप पत्र ठेवावं ? वाढलेल्या वयात, मानसिक ताण सहन होत नसतानाही का त्या आरोपांसाठी होणार्‍या उलट तपासणीला सामोरं जावं.
         तुम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले ? हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुम्ही, ते तर सगळेच बाप करतात,” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते. तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही ! असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं ? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं. अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती. तुम्हाला दूरदृष्टीच नाही ! ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. 
         माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय ? असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं. पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक. म्हणून रूजू झाली. तुम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो ?  तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला,खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता.समाजात एक वेगळा स्टेटस् ,दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते,काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले. आता ती हा विचार मात्र करत नाही की, तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही, शोभत नाही, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.
        मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो, त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे ?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं. तुम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात. विशेषत: बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना, एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे मूर्ख बनलो.जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व  संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे. आता बापांनी आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा. जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा.  
         ज्यांच्यासाठी  त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे ना. एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत, मस्तीत व्यतीत करायचं. सकाळ  संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतीत करायचे, त्यांचेशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासायचे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे. 
         शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे", "ये तो होना ही था."
       माझ्या सर्व मित्रांनो, आपल्याला हे पिंजऱ्यातील जीवन तितकेच आनंदात जगायचं आहे. जमेल  मित्रांनो,पहा प्रयत्न करुन !!!

(लेखक :-- प्रत्येक सामान्य बाप..!)
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...