गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

288. उपरती...

   “जरा म्हणून व्यवस्थितपणा नाही अंगात… काम थोडं अन् पसारा जास्त!” सुमनची भुणभुण. “जाळे पहा रूम मध्ये… आईच्या घरी काय केलं काय माहित?” इति सुमन.
      “साधी वरणाची फोडणी जमत नाही तिला, म्हणून बोलावं लागतं! मला काय हौस थोडीच आहे ओरडायची?” प्रभाकरला ऐकू जाईल असं मोठ्या आवाजात सुमन बोलली.
      “काहीही बोललं की हसण्यावर घ्यायचं…. जराही गंभीरपणा नाही. कसं होईल ते होवो बाबा! मी आहे म्हणून ठीक आहे, नाही तर अवघड आहे रे बाबा पराग तुझं ! घर व्यवस्थित ठेवता आलं नाही, पोटाला चांगलं चवदार खायला नाही मिळालं तर मग काय फायदा?” सुमन नेहेमीप्रमाणे तक्रारीचा पाढा पराग समोर वाचू लागली. 
       गेल्या आठ दहा दिवसांपासून हे रोजचंच झालं होतं. सुरूवातीला परागने ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं, पण गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यालाही आईचं म्हणणं पटू लागलं. नेहेमी आनंदी आणि उत्साही रहाणारा पराग थोडासा परेशान, त्रस्त राहू लागला. नेहा माहेरी गेल्यावर फोनवर नेहेमी हसत, थट्टा विनोद करत नेहाशी बोलणारा पराग यावेळी मात्र तुटक बोलू लागला.
       नेहा आणि पराग लहानपणापासून एकाच वर्गात शिकले आणि वयात आल्यावर एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्याच वर्षी लग्नबंधनात अडकले. दोघंही सतत उत्साही आणि हसतमुख असणारे, थट्टामस्करी करणारे आणि आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवणारे.
      शिक्षण झालं, दोघांचे जॅाब सुरू झाले आणि आता लग्नही झालं. जसा पराग वागायचा तशीच नेहाही अगदी मनमोकळेपणाने सासरी वावरायची. परागसोबत गप्पा, थट्टामस्करी, येतायेता बाहेर काहीतरी खाऊन येणं, आवडलं ते खरेदी करणं, सगळं पुर्वीसारखंच ! 
      खरं म्हणजे त्यात काही गैर नव्हतंच, पण सुमनच्या हे पचनी पडत नव्हतं. लग्नानंतर काही दिवस तिने दम पकडला. पण दोनेक महिन्यातच हळूहळू आवाजातला नाराजीचा सुर कडक ओरडण्यात आणि रागावण्यात बदलला.
       पराग कडून नेहाला सुमनच्या तापट आणि शीघ्रकोपी स्वभावाची ऐकून माहिती होतीच आणि आता पुरेपुर अनुभवही येत होता. सुमनच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तिने स्वतःत भरपूर बदल करून घेतले. सुमनचं बोलणं, टोकणं, शेरेबाजी, टोमणे ती हसतच स्वीकारायची आणि त्याप्रमाणे वागायचा शक्य तितका प्रयत्न करायची. नेहा गुपचूप ऐकते, उलट उत्तरं देत नाही हे लक्षात आल्यावर तर सुमन कोणतीच संधी सोडेनाशी झाली.
       आठदहा दिवसांपूर्वी मात्र छोट्याशा कारणावरून दोघींत थोडीशी धुसफुस झाली, गोष्ट पराग पर्यंत गेली सुमनमुळे. परिणामी नेहा आणि पराग यांच्यातही धुसफुस सुरू झाली आणि बरीच वाढली. 
      प्रभाकरने मधे पडत दोघांची समजूत काढली. “नेहा बेटा, चार आठ दिवसांसाठी तुम्ही दोघं कुठेतरी जाऊन या, जरा बदल झाला की आपोआप सगळ्यांचीच चिडचिड कमी होईल!”
      “मला आता वेळ नाही…” पराग तणतणत म्हणाला.
      “मला तरी कुठे सुट्टी आहे? मी ही रिकामी नाही…” नेहा.
       “नेहा, पराग ताणलं तर तुटतं! सोडलं तर टिकतं! ताणाताणी होऊ लागली तर एकानं माघार घ्यावी, विचार करण्यासाठी अवधी आणि अवकाश द्यावा, असं माझं मत!” प्रभाकर परत समजावणीच्या सुरात म्हणाला.
       सुमन मात्र निवांत पेपर वाचायचं निमित्त करून यांचं बोलणं ऐकत बसली, जणुकाही जे झालं त्यात तिची काहीच भुमिका नव्हती!
      “पराग तु किंवा नेहा दोनचार दिवस आत्याकडे जा आणि तिथून ॲाफिस करा, मी सांगतो तिला तसं!”
      “बाबा मी जाते आठ दिवस , पण आईकडे माहेरी, आत्याकडे नको!” नेहा शांत होत म्हणाली.
       सकाळीच नेहा बॅग भरून माहेरी निघून गेली. पराग चिडचिडत होता आणि सुमन नेहाच्या चुकांचा पाढा वाचून त्यावर फोडणी देत होती. पराग ॲाफिसला निघून गेला.
      “बस सुमन जराशी, तुलाही आराम हवा! नेहावर आणि तिच्या चुकांवर सारखं लक्ष ठेऊन तुही दमली असशील!” प्रभाकर म्हणाला.
     “मी काय मुद्दाम करतेय का? मला समजतंय, मी तिला बोललेलं तुम्हाला पटत नाही ते. पण मग तिला आपल्यासारखं वळण कसं लावणार?” सुमन रागात बोलली.
      “आपल्यासारखंच तिने बनावं हा हट्ट कशासाठी?”
      “परागसाठी! कारण परागला आपली सवय आहे.”
      “त्यांचं सहजीवन, त्यांचा संसार आहे. ती दोघं ठरवतील कुणी कुणासाठी किती बदलायचं ते ! आपण नाही!“
      “असं कसं? पराग का बदलेल तिच्यासाठी त्याच्या आवडीनिवडी आणि सवयी?“
      “पराग साठी नाही पण ती तुझ्यासाठी तिच्या वागण्याबोलण्यात, उठण्याबसण्यात, स्वयंपाक आणि ईतर कामात तुझ्या कलाकलाने बदल करतच आहे की! ते नाही का लक्षात येत तुझ्या? तिच्या चुका दिसतात, पण त्या दुरूस्त करायची धडपड दिसत नाही. 
       काल पहिल्यांदा उलट बोललेलं दिसलं आणि थेट परागपर्यंत तु विषय नेलास! इतक्यांदा तु तिच्यावर रागावलीस, पाडून बोललीस, तिने वाढवला का विषय? तुझं बोलणं हसत स्वीकारलं तिने प्रत्येक वेळी. परागवर रागावते का तु असं?
       नेहाने टापटीप सगळं काम उरकावं असं तुला वाटतं ,पण परागने फेकलेला टॅावेल असो वा मोजे, ते तुला दिसत नाहीत? दोघंही सारखीच शिकलेली आणि बाहेर सारखंच कर्तुत्व दाखवणारी, मग हा फरक का करतेस? अशानं परागला स्वतःच्या बेफिकीर वागण्याची तर जाणिव होणार नाहीच, पण नेहाने स्वतःत केलेले बदल आणि घरकामाचे कष्ट याचीही होणार नाही !”
      “बायकांचं कामच असतं ते, मी नाही का बदलले तुमच्या साठी?”
       “बायका निसर्गतःच नव्या वातावरणाशी अगदी सहजतेने जुळवून घेऊ शकतात म्हणून त्या बदलतात. पण प्रत्येक वेळी त्यांनीच तडजोड करावी असं मी आपल्या संसारातही कधी वागलो का?”
      “नाही. पण….”
      “नेहा आपल्या घरी परागसाठी आलीय, आपल्यासाठी नाही, हे तर मान्य आहे ना?”
       “हो.”
       “ मग ती परागला जसं आवडतं तसं वागतेय, शिकतेय ते त्याच्यावरील प्रेमासाठीच ना? तु तिला इतक्यांदा बोललीस, तिने कधी परागकडे चुगली केली?”
       “नाही.”
       “पण ती तुला बोलल्याबरोबर तु परागला यात ओढलंस आणि तो तिला रागावला. नवरा जर प्रेमाने वागत असेल तर कोणतीच सुन सासरच्या इतर मंडळीचं बोललेलं मनाला लावून घेत नाही. पण जर ज्याच्या भरवशावर ती इथे आलीय तोच बोलू लागला तर ती स्वतःला मानसिकरीत्या असुरक्षित समजते आणि ऐकणंही सोडते.”
      “हम्म…”
       “मला वाटतं घरात आनंदी आनंद हवा असेल तर, तु परागच्या मनात तिच्याविषयी काही भरू नकोस. उलटपक्षी ज्यासाठी तिला बोलतेस त्याच चुका आपला राजकुमारही करतो, तेव्हा त्यालाही त्याच्या चुका दाखव ! त्याच्या पसाऱ्यासाठी तिला जबाबदार धरू नकोस. पटतंय का?”
       “खरंच की! नेहा तशी खुप चांगली मुलगी आहे. पण माझ्याच वागण्यात सासूपणा आणि दूजाभाव आला आणि तिला रागात बोलणं वाढलं .चुकलंच हो माझं! आता काय करायचं?”
      “काही नाही, आपल्यामुळे त्यांच्या मनात दरी पडेल, एकमेकांविषयी अढी निर्माण होईल असं वागायचं, बोलायचं नाही. कधी त्यांच्यात दुसऱ्या कोणत्या कारणाने वितुष्ट आलं तर ते दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. ती सुन म्हणुन जितक्या पटकन तिच्या चुकांवर बोट ठेवतो तितक्याच पटकन परागचीही चुक त्याला दाखवून द्यायची. जितक्या मोठ्या मनाने परागच्या छोट्याछोट्या गोष्टींचं कौतुक करतो, तसंच नेहाचं करतानाही मोठेपणा दाखवायचा! बास्स, बाकी काही नाही!”
      “अहो खरंच की! माझं सगळं आयुष्य आत्तापर्यंत परागच्याच अवतीभवती करण्यात गेलं, तोच माझं विश्व होता. नेहा आली आणि वेळेची विभागणी झाली. पण मी त्याला चुकून प्रेमाची विभागणी समजले आणि मीच किती चांगलं परागचं लक्ष ठेवते हे सगळ्यांवर बिंबवत गेले. पण मनात नेहासाठीही तोच प्रेमाचा भाव ठेवला तर दुप्पट प्रेम मिळेल हे विसरले! चला आता पटकन आवरा बरं, बाजारात जायचंय!”
       “बाजारात? कशासाठी?”
       “कशासाठी काय? पहिला संक्रांतसण आहे नेहाचा, मस्त पैठणी आणि तिळगुळ घेऊन जाऊ तिच्या माहेरी आणि तिला घेऊन येऊ. नातं तिळासारखं पुष्ट आणि गुळासारखं घट्ट बांधून ठेवणारं नको का करायला?”

लेखिका  : रश्मी लाहोटी. ©️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...